मराठी पुस्तके.ऑर्ग

2008 ऑक्टोबर 3
by माझी दुनिया

कॉपीराईट कायद्यानुसार कालबाह्य झालेल्या  आणि विशेषत: मुद्रित प्रती अस्तित्वात नसलेल्या पुस्तकांकरता , ठाण्याच्या संवाद या संस्थेने एक संकेतस्थळ सुरू केले आहे. अजून बाल्यावस्थेतल्या या संकेतस्थळावर सध्या तीन पुस्तके आहेत. कोणीही ती फुकटात उतरवून घेऊन वाचू शकतो. ह्या संकेतस्थळाचे उद्‍घाटन २८ संप्टेंबर रोजी ठाण्याच्या न्यू इंग्लिश स्कूल इथे झाले. या प्रसंगी एक कार्यकती / स्वयंसेवक म्हणून मी स्वत: उपस्थित होते.

या तीन पुस्तकांपैकी एक पुस्तक मी स्वत: टंकायचे काम केले आहे. ते म्हणजे इतिहासाचार्य वि.का.राजवाडे यांचे ’भारतीय विवाह-संस्थेचा इतिहास’. भयंकर स्फोटक विधानं असलेल्या या पुस्तकाचे टंकन करताना माझ्या मनात आलेल्या शंकांविषयी मी एक प्रस्तावना; माझी बाजू मांडण्याकरता लिहिली होती. काही कारणास्तव ती पुस्तकाबरोबर उपलब्ध होऊ शकली नाही. पण ती अशी होती की :

प्रस्तावना

सर्वप्रथम ई संवाद या संस्थेने मला हे पुस्तक टंकण्याकरिता सोपविले त्याबद्दल त्यांचे आभार.

मध्यंतरी महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रात एक आवाहनवजा बातमी वाचली की, ’जुनी मराठी पुस्तके,जी आज सहजगत्या उपलब्ध नाहीत, ती वाचकांसमोर यावीत या सद्‌हेतूने ठाण्याच्या ई संवाद या संस्थेने ; ही पुस्तके युनिकोडमध्ये टंकीत करून, संगणकावर उपलब्ध करून देण्याचा उपक्रम चालू केला आहे’. त्यात संस्थेने वेगवेगळ्या पातळीवर स्वयंसेवकाची गरज असल्याचे उल्लेखिले होते.मराठी भाषा आणि पुस्तके हे दोन्ही जिव्हाळयाचे विषय असल्याकारणाने ; मी त्यांच्याशी संपर्क

साधून, युनिकोडमध्ये टंकन करण्याकरता समर्थता दर्शविली. त्याप्रमाणे त्यांनी पुस्तक सोपविल्यावर कामाला सुरूवात झाली.

मला, इतिहासाचार्य कै.वि.का.राजवाडे यांचे; कै.श्रीपाद अमृत डांगे (कॉम्रेड डांगे) यांची प्रस्तावना लाभलेले ’भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास; हे पुस्तक सोपविण्यात आले. त्याबरोबर पाठवलेल्या

टाचणात संस्थेचा ’ पुस्तकात अनेक संस्कृत शब्द असल्याने आणि मला युनिकोड टंकनाचा सराव

असल्याने, हे पुस्तक सोपवित असल्याचा उल्लेख करून नेमके कोणत्या पानापासून सुरूवात करायची हे सांगितले होते.

मी टंकनाला सुरूवात केली खरी, पण पहिल्या पानापासूनच भयंकर अस्वस्थ झाले. याचे कारण,पहिल्याच प्रकरणाचा विषय स्त्री-पुरूष समागमसंबंधक कित्येक अतिप्राचीन आर्ष चाली असा होता.एकतर ह्या विषयावर लिहिलं गेलेलं खाजगीत चवीने वाचलं जात असले तरी ते उघडपणे चारचौघांत न दाखवण्याचा संभावितपणा समाजात सर्रास आढळतो. दुसरं असं की हे पुस्तक इंटरनेटच्या माध्यमातून जगभर कुठेही उपलब्ध होऊ शकणार होतं, आणि ते टंकणार्‍याचे नाव छायाचित्रासह त्यात घातले जाणार होते. ही गोष्ट माझ्या आत्तापर्यंतच्या महाजालावरच्या कमावलेल्या अबाधित स्थानाला धक्का बसवू शकली असती. आस्थेने माझे लेखन वाचणारा माझा मित्रपरिवार, वाचकवर्गकदाचित या गोष्टीमुळे गमावण्याची वेळ माझ्यावर या गोष्टीमुळे येऊ शकली असती. केवळ सुरूवातीच्या पानांतच नव्हे तर संपूर्ण पुस्तकांत आर्यपूर्वजांविषयी अनेक स्फोटक विधाने आहेत.आता प्रत्यक्ष लेखकाची मात्तबरी आणि त्याला खास लाभलेली कॉम्रेड डांग्यांची प्रस्तावना यामुळे पुस्तकाची पत कमी खचितच होत नाही, पण मग आपण कामसूत्र सारखे वैषयिक विषयाला वाहिलेले पुस्तक तर टंकीत नाही ना असा विचार मनात यायला लागला. ही कोंडी कशी फोडावी याचा विचार सुरू झाला. तसे संस्थेने मला दुसरे पुस्तक घेण्याची मुभा दिली होती. पण मुळातच आपला अमूल्य वेळ खर्च करून, युनिकोडमध्ये पूर्ण पुस्तक टंकन करणार्‍यांची वानवा आहे. त्यावर उपाय म्हणून; मी पुढचे टंकन करायच्या आधी पुस्तक वाचून काढायचा निर्णय घेतला. आश्चर्य म्हणजे कॉम्रेड डांग्यांच्या प्रस्तावनेतून ह्या पुस्तकाचा धक्कादायक इतिहास कळला, त्याचा सारांश त्यांच्याच शब्दांत असा की:-

या ग्रंथाचे पहिले प्रकरण १९२३ च्या मे महिन्यात पुण्याच्या सुप्रसिद्ध ’ चित्रयमजगत‌‌‌‌‌‍’

मध्ये प्रसिद्ध झाले होते. पण या पहिल्याच प्रकरणाने महाराष्ट्रातील वाचकांत, विशेषत:विद्वानांत, भयकंर वादळ उठले. त्यांनी चित्रमयजगतचे मालक वासुकाका जोशी यांना

पत्रे पाठवून आणि काठी दाखवून धमकी दिली की पुढचे भाग प्रसिद्ध कराल तर तुमचा छापखाना आम्ही जाळू. पुस्तक छापणे थांबले. हे पुस्तक अथवा विवेचन समाजशास्त्राच्या मांडणीला, विशेषत: मार्क्स-एंगल्सच्या इतिहासविषयक सिद्धान्ताला , कच्चा माल या नात्याने किती उपयुक्त ठरेल हे माझ्या लक्षात येऊन मला आनंद वाटला. हा ग्रंथ मी छापयचा असे ठरविले. राजवाड्यांशी बोलल्यावर ते म्हणाले तुम्ही बरेच धाडसी दिसता. हा ग्रंथ छापलात तर कर्मठ मंडळी तुमचा छापखाना जाळतील. पण तुमचा निश्चय असल्यास मी एक तोड सुचवितो. मी हा ग्रंथ अद्याप पूर्ण लिहिलेला नाही. तेव्हा मी त्याचे क्रमश: सोळा पानांचा फॉर्म होईल असे एक एक प्रकरण तुमचेकडे पाठवीन. तो फॉर्म छापून तुम्ही मला पाठवा म्हणजे मी पुढचा भाग तुम्हाला पाठवीन. तुमच्याकडून छापील फॉर्म आलानाही तर मी समजेन की हा ग्रंथ तुम्हालाही झेपत नाही. किंवा हा व्याप करता तुमचे दिवाळेनिघाले आहे. हे समजून मी पुढचे प्रकरण लिहिणारही नाही. आणि पाठवणारही नाही.”

राजवाडे यांनी आपली प्रतिज्ञा पूर्णपणे पाळली होती. मी जेव्हा एक फॉर्म छापून पाठवीत असे तेव्हाच ते दुसरा लिहीत. चौथ्या प्रकरणाचा भाग छापण्यापूर्वीच मी मार्च १९२४ मध्ये कैदेत गेल्यामुळे व माझ्या सहकार्‍यांकडून त्यांना त्या प्रकरणाची छापील प्रत न मिळाल्यामुळे त्यांनी पुढचा भाग लिहीण्याचे सोडून दिले. मी १९२७ साली सुटून आलो तोपर्यंत ते दिवंगत झाले होते.

यामुळे या ग्रंथाची केवळ चारच प्रकरणे उपलब्ध आहेत.

प्रत्यक्ष पुस्तक वाचून तर आर्यकालीन अशा बर्‍याच चालीरितींची माहीती मिळाली जी आजच्या स्वैराचार बोकाळलेल्या काळातही आपण सहज पचवू शकणार नाही. एकूण मला विषय खटकत असला तरी, आर्यकालीन चालिरितींची रोचक माहिती या पुस्तकाद्वारे मिळते या निर्णयाद्वारे मी

टंकन पुढे चालू ठेवायचे ठरविले आणि आज आपल्याला हे पुस्तक उपलब्ध होऊ शकले.

टीप : टंकीत पुस्तकातले शुद्धलेखन ( ‍र्‍ह्स्व, दीर्घ ) हे मुद्रित पुस्तकाबरहुकुम आहे.

सौ. श्रेया देवेंद्र रत्नपारखी

वाचकांनी ह्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्यावी.

No comments yet

Leave a Reply

Note: You can use basic XHTML in your comments. Your email address will never be published.

Subscribe to this comment feed via RSS