लाथाळ्या

2009 ऑक्टोबर 4
by माझी दुनिया

सध्या ’मनसे’ आणि ’शिवसेने’चा एकमेकांना दुगाण्या झाडण्याचा उद्योग सुरू आहे. समस्त मराठी जनता आणि इतर पक्ष याचा मनसोक्त आस्वाद घेत आहेत. एकाने दुसर्‍याला ’सुपारीमॅन’ म्हणायचे, मग दुसर्‍याने ’मी काय पानपट्टी काढली नाही’ असे म्हणायचे, परत पहिल्याने दुसर्‍याला ’शेंदूर फासलेला गोटा’ म्हणायचे. हेच चालू आहे. मराठी जनतेला भाऊबंदकी नविन नाही पण हे म्हणजे अतिच झाले आहे. एकमेकांशी भांडून, मराठी माणसांचा कळवळा आल्याचे दाखवत मते गोळा करून पुन्हा ’ये रे माझ्या मागल्या’ करायचे. एकमेकांवर लाथाळ्या झाडण्यापेक्षा आपापल्या प्रचारावर लक्ष केंद्रित करून प्रत्यक्ष निवडणूकीतून आपले बलाबल सिद्ध करा की !

गंमत पहा, एकेका पक्षाच्या जाहीरनाम्याची…
काल शिवसेनेची जाहिरात पाहिली ’ अन्नाधान्याचे भाव स्थिर ठेऊ / कमी करू ’ अश्या अर्थाची. अहो पण पालिकेत सत्ता असताना तिथला भ्रष्टाचार कमी करण्यात का नाही यांना यश आले ? यांच्याच पक्षाच्या महापौरांनी गेल्या दोन वर्षात गणेशोत्सवात विधायक बदल घडवून आणायचे ठरवल्यावर त्यांना का धुडकावून लावले गेले ? गणपतीच्या मूर्तीची उंची कमी व्हावी, कृत्रिम तलाव वापरात यावे या गोष्टींना शिवसेना अध्यक्षांनी का नाही पाठिंबा दिला ?

’अन्नधान्याच्या भावा’बाबतचाच जाहिरनामा आज राष्ट्रवादीने मांडला होता. अरे पण सत्ता दिल्यावर भाव स्थिर ठेऊ याला काय अर्थ आहे ! सत्ता तुमच्या हातात आहेच की, मुळात ते इतके वाढूच का दिले ? स्वत: कृषिमंत्री असताना शेतकर्‍यांना आत्महत्या का कराव्या लागल्या ? हे प्रश्न कुणालाच कसे पडत नाहीत ?
’मोफत विजेचे’ आश्वासन देतात, पण कुणाच्या जिवावर ? आम्ही करदाते इथे कर भरतो. हे राजकारणी कर तरी भरतात का ? मंदईने परिसीमा गाठलेली आहे, महागाई भडकलेली आहे तरी यांचा प्रचारावर पाण्यासारखा पैसा ओतणे चालूच आहे, हे सगळे कोण्याच्या जीवावर करतात ? नगरसेवक निवडून यायच्या आगोदर कार्यकर्ता रेल्वे, बस, रिक्षा ने प्रवास करतात, नगरसेवक झाल्यावर त्यांच्याकडे स्वत:ची गाडी घ्यायची ऐपत येते, तॊ कोणाच्या जीवावर ? पैसा खायची एक संधी हे राजकारणी सोडत नसतील.

हे राजकारणी इतके कसे कोडगे आहेत ? सत्ता मिळण्याकरता आज या पक्षात, उद्या त्या पक्षात, कसलीच निष्ठा नाही, पक्षाशी नाही तर जनतेशी काय कप्पाळ ठेवणार आणि देशाशी तर विचारूच नका.

मतदारहो, नीट विचार करून मतदान करा, योग्य वाटेल तो उमेदवार निवडून द्या. आणि निवडून आल्यावर त्याने काम नाही केले तर सत्तेवरून खाली खेचायलाही मागे पाहू नका.

4 प्रतिसाद leave one →
  1. 2009 ऑक्टोबर 4

    खुपच सुंदर लेख लिहिलाय. अगदी सगळे मुद्दे कव्हर केले आहेत तुम्ही. माझा उद्याच्या लेखाचा” ’हिरो’ रहाणार होता शरद पवार.. पण आता तुम्ही सगळं लिहिल्यामुळे नाही लिहिणार. उत्तम पोस्ट.. टु द पॉइंट.. आवडलं.

  2. 2009 ऑक्टोबर 5

    लेख वाचला. शिवसेनेने मराठी मतांना गृहित धरल्यामुळे सगळे प्रॉब्लेम्स झाले आहेत ही गोष्ट त्रिवार सत्य आहे. कितिही जरी नाही म्हंटलं तरिही बाळासाहेबांच्या बद्दल अजुनही सॉफ्ट कॉर्नर आहेच. तसा दादु बद्दल नाही. त्याचं कॉंट्रिब्युशन अगदी नगण्य आहे. कुठेही काहिही झालं की आधी राज काही तरी वक्तव्य देतो, नंतर दादु त्याचीच ’री’ ओढतो. दादु मधे फारसा दम नाही हे सरळ सरळ लक्षात येतं. असो.. दिवस थोडे शिल्लक आहेत काय होइल ते बघायचं. लेख शेअर केल्याबद्दल आभार. मी पण कांही लोकांना लिंक पाठवतोय. कृपया लिंक डीलिट करु नका.

  3. 2009 ऑक्टोबर 27

    Parinam Zero

तुमचा अभिप्राय नोंदवा

Note: You can use basic XHTML in your comments. Your email address will never be published.

Subscribe to this comment feed via RSS