[ Wednesday, August 22, 2007 01:34:58 am]
गाडीचा फायदा हवं तेव्हा, हवं तिथं पोचण्यासाठी. परंतु या दृष्टीनं गाडीवर विसंबून रहायचं असेल, तर तिची तब्येतही व्यवस्थित जपायला हवी, अन्यथा रंगाचा बेरंग ठरलेलाच. तो टाळण्यासाठी अडगळीत टाकलेलं ऑपरेशन म्यॅन्युअल बाहेर काढा आणि जरा प्रेमानं आपल्या कारकडे बघा.
………………..
गेट टूगेदर ठरलेलं असतं, सगळे मित्र किंवा नातेवाईक भेटायच्या ठिकाणी पोचलेले असतात किंवा मार्गावर असतात. आता फक्त तुमचीच खोटी असते. पण तुम्ही निर्धास्त असता, कारण तुमची फोर-व्हीलर खाली वाट पहात असते, दोन मिनिटात काम संपवायचं, इग्निशन की लावायची की झालं १५ मिनिटात हजर असा तुमचा प्लान असतो. काम संपवून पाच मिनिटात तुम्ही खाली उतरता, घाई-घाईत दार उगडून बसता, इग्निशन की लावून गाडी स्टार्ट करायला जाता…आणि फुस्स… गाडी स्टार्टच होत नाही. मग चोक द्या, कुणाला तरी धक्का मारायला सांगा, उगाचच बॉनेट उघडून प्लग वगैरे निघालेला नाही ना बघा, अनेक भानगडी करूनही गाडी ढिम्म हलत नाही. अशावेळी परावलंबी असणं म्हणजे काय हे कळतं.
ही वेळ गाडी चालवणाऱ्या प्रत्येकावर कधी ना कधी येतेच, ती सर्वथा टाळणं अशक्य आहे, पण तिचं प्रमाण कमी करणं मात्र शक्य आहे. त्यासाठी गरज आहे आपली कार जाणून घेण्याची, तिच्याकडे डोळसपणे लक्ष पुरवण्याची, त्यासाठी काय करायला लागेल हेच आपण बघुया.
चार चाकी घेणं हे प्रत्येकाच्या आयुष्यात फार महत्त्वाचं असतं, परंतु ती एकदा घेतल्यावर तिची व्यवस्थित काळजी घेतली जातेच असं नाही. खरं तर प्रत्येक गाडीबरोबर ‘ऑपरेशन मॅन्युअल’ नावाचं पुस्तक कार कंपनी देते, परंतु बहुदा हे पुस्तक वाचायची तसदी कोणी घेत नाही. या मॅन्युअलमध्ये कारची संपूर्ण माहिती असते, आणि कुठल्या कुठल्या बाबी चालकाने तपासाव्यात हे ही दिलेले असते. या मॅन्युअलच्या थोड्याफार अभ्यासानं आठवड्यात किंवा महिन्याभरात गाडीत शिरल्यावर गाडीची तब्येत तपासता येईल.
त्यातल्या काही गोष्टी अशा…
ठ्ठ अनेकवेळा गाडीच्या कारपेटखाली पाणी साचलेलं असतं, ते काढायचं राहून जातं. यामुळं कारपेटची वाट तर लागतेच शिवाय गाडीचा पत्रा गंजण्याचा धोकाही असतो. त्यामुळं पावसाळ्यात किंवा गाडी वॉश करून आणल्यावर असं कुठं पाणी साचलेलं नाहीयेना हे बघायला हवं.
ठ्ठ काही वेळा काहीतरी जळाल्याचा वास येतो, हा वास इलेक्ट्रिकच्या वायरींचा असेल तर ते धोकादायक ठरू शकतं. उंदीर, घुशींसारख्या प्राण्यांना दात साफ करायला गाडीच्या केबल्सच लागतात. त्यांची ही सवय आपल्याला भारी पडू शकते. त्यामुळं असा जळका वास आला तर गाडी बंद करून, बॉनेट उघडून पहाणी करावी. बॅटरी डिसकनेक्ट करावी आणि कारागिराला बोलवावं.
ठ्ठ पेट्रोल अथवा डिझेलचा वास काहीवेळा सारखा येतो, कुठून येतो काही कळत नाही पण वास मात्र येतो. हा वास इंधनाच्या टाकीचा व्हेंटिग पाइप जाम झाला असल्याने किंवा ओव्हरफ्लोमुळं येण्याची शक्यता आहे.
ठ्ठ इंजिनमधून तेलाचा जळका वास येतो, इंजिन ऑइल जास्त झाल्यानं ओव्हरफ्लो झाल्यावर किंवा ते खूप जुनं झालं असेल, तर ही वेळ ओढवते. इंजिन अति तापलं तरीही असा वास येऊ शकतो.
ठ्ठ काहीवेळा आपण तंदीमध्ये गाडी सुरू करतो, गाडी नेहमीसारखा वेग पकडत नाही, रबर जळाल्यासारखा वास येतो, शक्यता आहे की आपण हँडब्रेक काढलेला नाही. ब्रेकमध्ये गाडी चालवली तर असा वास येतो, किंवा टायर अति गरम झाले असतील तरीही रबर जळाल्यासारखा वास येतो.
अशा गोष्टी घडण्याच्या वेळा, वेळच्या वेळी इन्स्पेक्शन केलं तर कमी करता येतील, त्यासाठी जरा प्रेमानं, अधे मधे वेळ काढून म्यॅन्युअलमध्ये डोकावून गाडीकडे बघण्याची गरज आहे, म्हणजे ऐनवेळेला पंचाईत होणार नाही.


