दोन आठवड्यांपूर्वी माझ्या लेकाला संध्याकाळी शाळेतून आल्यावर खेळायला गेला असताना इमारतीच्या मागाच्या आवारातल्या मैदानात एका झाडावर, साधारण ३-४ मजले उंचीवर एक कावळा फडफडत केविलवाणी धडपड करताना दिसला. तो अडकला होता मांज्याच्या गुंत्यामध्ये. त्याचे सोबती त्याच्या सुटकेकरता कलकलाटाशिवाय काहिही करू शकत नव्हते. आणि तो कावळा स्वत: प्रयत्न करत असताना अधिकाधिक गुरफटत होता. माझ्या लेकाने त्याच्याबरोबरच्या मित्रांना हे दाखवले. मित्र घाबरून घरी पळून गेले. हा मात्र त्या कावळ्याला कसा सोडवता येईल याचा विचार करत तिथेच थांबला. तितक्यात इमारतीतीलच त्याच्यापेक्षा वयाने थोडी मोठी असलेली मुले येताना दिसली. त्यांना जाऊन त्याने मदतीची विनंती केली पण त्या मुलांनी अर्थातच याला ‘कावळ्याला काय सोडवतो?’ म्हणून वेड्यातच काढले. जसा जसा वेळ जात होता, अंधार पडत होता तशी तशी कावळ्याची धडपड मंदावत होती. लेक हे मला सांगायला म्हणून घरी आला, पण त्याला खायला देऊन, तो खेळायला गेल्यावर मी काही वस्तू आणायला म्हणून बाहेर गेले होते. निराशेने तो पुन्हा घराबाहेर पडणार इतक्यात त्याचे बाबा आले. इतरांना वाट्टेल त्या मदतीचा हात द्यायच्या त्यांच्या सवयीमुळे….लेकाने सांगितले हकिकत ऐकून ते देखील त्याच्याबरोबर त्या कावळ्याला सोडवायच्या मोहीमेवर तसेच बाहेर पडले. प्रत्यक्ष बघितल्यावर त्यांच्याही लक्षात आले की, इतक्या उंचीवर तो कावळा अडकून पडलेला असल्याने आपल्याला काहीही करता येणार नाही. पण त्यांच्या मोबाईलमध्ये एका पक्षीमित्राचा मोबाईल नंबर होता ( असेही त्यांच्या मोबाईल मध्ये घरच्या माणसांपेक्षा… डॉक्टर्स, हॉस्पिट्ल्स, ब्लड बॅंक्स, फायर ब्रिगेड यांचेच नंबर्स सापडतील म्हणा 🙂 ) त्याला ताबडतोब फोन लावून बाबांनी काय करता येईल याची माहिती विचारली. त्या पक्षीमित्राने त्यांना फायर ब्रिगेड्ला फोन करायची सूचना केली. मग पुन्हा फायर ब्रिगेड ला फोन लावला……त्यांनी विचारले की तो कावळा अजून जिंवत आहे का? खर तर आता बराचसा अंधार झाला होता, तो कावळा देखील मलूल झाला होता त्यामुळे गपगुमान बसून होता. पण बाकीचे कावळे कावकाव करत असल्याने तो अजून जिंवत असावा असे वाटत होते. अर्थात अग्निशमन दलाचे जवान सुटका करायला येईपर्यंत तो जिंवत राहिला असता की नाही हे सांगणे कठीण होते. त्याप्रमाणे त्यांना तसे सांगितल्यावर ते लगेच येतो म्हणाले खरे…पण पाचच मिनिटांनी “कुठे तरी पावसामुळे झाड पडले ते हलवायला जातो आधी आणि मग येतो” असा त्यांचा फोन आला. वाटले….. आता काही तो कावळा जिंवत रहात नाही…..पडलेले झाड हलावयला किती काळ जाईल कोण जाणे….शेवटी देवाकडे प्रार्थना केली की त्या कावळ्याकरता काय योग्य असेल ते त्याच्या बाबतीत घडू दे. जर पंख जायबंदी झाला असेल तर पुढचे आयुष्य अपंगत्व येण्यापेक्षा आत्ताच त्याची सुटका होऊ दे. पण पुढच्या दहा मिनिटातच अग्निशमन दलाचे जवान आले, त्या मांज्याच्या गुंत्यात आडकलेल्या परंतु तग धरून जिवंत राहिलेल्या कावळ्याला त्यांनी सुखरूप सोडवले, मात्र माणसाचा स्पर्श झाल्याने इतर कावळ्यांनी त्याला टोचून मारायला नको आणि त्याच्या जखमांना मलमपट्टी म्हणून एका पेटीत सुरक्षितपणे त्याला घेऊन गेले. त्या दिवशी एका पक्ष्याला जीवनदान दिल्याच्या आनंदात बाप लेक दोघेही जाम खुशीत होते 🙂 .
भूतदया ज्याचे मनी | तोचि साधू ओळखावा | देव तेथेचि जाणावा ||
खूपच छान व भावस्पर्शी !!!