मंडळी, गेला सव्वा महिनाभर वाट पहात असलेल्या गोष्टीचे आज सार्थक झाले. खरं तर इंडिब्लॉगरने गरजेपेक्षा जास्त वेळ लावला याला. कधी नव्हे ते माझ्या जालनिशीचे एखाद्या मान्यवर संकेतस्थळाकडून गुणांकन होणार होते.
झालं काय की ! मागच्या महिन्यात काही सहजालनिशीकारांनी इंडीब्लॉगर या जालनिश्यांचं गुणांकन करणार्या संकेतस्थळावर नोंदणी केली आणि त्यांच्या जालनिशीचं गुणांकन त्यांना करून मिळालं. त्यांनी बझ वर तसा निरोप टाकताच, मला इंडीब्लॉगरच्या गुणांकनाबद्दल सहाजिकच प्रश्न पडला. साधारण साडेतीन वर्षे ही जालनिशी मी लिहितेय. लिहितेय म्हणण्यापेक्षा थेट माझं स्वत:चं असं लिखाण न देता….मला सापडलेले….आवडलेले महाजालावरचे दुवे मी इथे मांडत असते. असं असताना मला इंडिब्लॉगर माहित नसावं म्हणजे आश्चर्यच्. पण घडतात अश्याही घटना. विविध संकेतस्थळं विविध स्पर्धा आयोजित करत असतात. पण मला कळून मी त्यात भाग घेईपर्यंत शेवटची तारीख उलटून गेलेली असते. इथेही तेच झालं. दर महिन्याच्या १० तारखेला इंडीब्लॉगर गुणांकन करत असते. मला ही बातमी कळली ११ फेब्रुवारी २०१० रोजी. म्हणजे आली का पंचाईत ! माझ्या सहजालनिशीकारांकडे गुणांकन असताना माझ्याकडे मात्र नाही…ही गोष्ट पचवायला थोडी कठीण झाली.
आधीच एक तर माझी जालनिशी ब्लॉगरवर नसून वर्डप्रेसवर असल्याने ब्लॉगर्स चे जालनिशीकार जितक्या सहजपणे जालनिशीच्या देखण्या रूपात बदल करू शकतात…तितक्या सहजपणे ते मला करणं शक्य नसल्याने एक उद्वेग होताच मनात.
अनेक वेळा वर्डप्रेसवरची जालनिशी ब्लॉगरवर हलवावी असेही मनात आले होते. पण एक तर आता अडीच लाखांचा वाचक भेटींचा टप्पा माझ्या जालनिशीने पूर्ण केलाय. दुसरं असं की साडेतीन वर्षापेक्षा जास्त दिवस ही जालनिशी लिहिल्याने…कमाल मर्यादेमुळे सगळे लेख ब्लॉगरवर हलवंणं शक्य नाहिये. तिसरं म्हणजे वर्डप्रेसवर असून सुद्धा अडीच लाख माणसं जालनिशीला भेटून जातात त्या अर्थी नक्कीच माझी जालनिशी लोकांच्या पसंतीस उतरत असावी…मग हा माझा गोतावळा सोडून जाणार कसं ? आत्तापर्यंत साडेतीन वर्षात कमावलेलं नाव….एका निर्णयाने होत्याचे नव्हते झाले असते. असो, त्यामुळे जालनिशी कुठेही हलवंणं शक्य नाही.
मागच्या वर्षी ’स्टार माझा’ ने घेतलेल्या ’ब्लॉग माझा’ या स्पर्धेत भाग घेतला होता पण बक्षिस न मिळाल्याने या वर्षी पुन्हा भाग घ्यायच्या फंदात पडले नव्हते. मग निदान इतर जालनिशीकारांच्या तुलनेत आपण कुठे बसतो हे तरी चाचपडून बघायला हवं.म्हणून या इंडिब्लॉगरच्या गुणांकनाविषयी कळल्यावर ताबडतोब जालनिशीची नोंदणी केली.
१० मार्च ला गुणांकने जाहिर होणार होती. तोपर्यंत कशी तरी कळ काढली. पण १० मार्च ला मात्र अनेकदा येऊन डोकावून गेले तरी तिथे काही हालचाल दिसली नाही. ११ मार्चला सकाळी पुन्हा एकदा भेट दिली तेव्हा १३ मार्च ला गुणांकनं जाहिर होतील असा संदेश वाचण्यात आला. मनातल्या मनात इंडिब्लॉगरला दोष दिला….फेब्रुवारी २८ दिवसांचा असल्याने कदाचित ३० दिवसांचए चक्र पाळावे हा हेतू इंडीब्लॉगरचा असावा असेही वाटले. पुन्हा दोन दिवस कशीतरी कळ काढली. १३ तारखेला पुन्हा एकदा संकेतस्थळ उघडून पाहिले. त्यावर अजूनही गुणांकन परिक्षा चालू आहे….१६ तारखेपर्यंत गुणांकने जाहिर होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती.१० ते १६ मार्च मध्ये रोजी किमान ५० वेळा तरी इंडिब्लॉगरला भेट दिली असेल. १६ तारखेला दुपारी संदेश वाचला की रात्री १० वाजेपर्यंत गुणांकने जाहिर होतील. आता मात्र इंडिब्लॉगरने फसवले की काय अशी भावना बळावायला लागली. खरं तर तसा काही आर्थिक भाग यात नसल्याने फसवणूक झाली असती तरी नुकसान काही नव्हते. पण कोणीही यावे आणि टपली मारून जावे या उक्तीप्रमाणे कोणीही यावे आणि फसवून जावे असे तर नाही ना होतं असा विचार करून मी नाद सोडून द्यायचा ठरवले. उद्या काहीही झाले तरी इंडीब्लॉगरवर जायचे नाही हे मनाशी ठरवून मी निराश अवस्थेत झोपले. सकाळी सुद्धा अगदी आरामात संगणक चालू केला. कितीही मनाशी ठरवले होते तरीही इंडीब्लॉगरवर गेलेच. तिथे चक्क संदेश बदलला होता आणि पुढच्या गुणांकनाची संभाव्य तारिख दिसत होती…एप्रिल महिन्यातली. एक विचार आला…..की या महिन्यात गुणांकनं जाहिर न करता पुढच्याच महिन्यात करणार आहेत की काय ? तसं जर असेल तर आपली नोंदणीच यातून रद्द करू ! ना रहेगा बास ना बजेगी बांसुरी ! तात्काळच्या या जमान्यात अजून महिनाभर कोण या वेणा सोसणार ? याच तिरीमिरीत मी माझ्या खात्यात पाऊल टाकले आणि पाहाते तो काय ! हे शेजारी उजवीकडे लावलेल गुणांकनाचं चिन्ह तिथे दिमाखात उभं होतं. ते पाहून हर्षभरीत तर झालेच कारण १०० पैकी ८२ गुण कधी शालेय जीवनातही कमावलेले नव्हते. पण आता हे गुणांकन टिकवण्याची जबाबदारी वाढली आहे हे मात्र खरं ! पाहूया पुढच्या महिन्यात काय होतयं गुण वाढताहेत की कमी होताहेत ?
अभिनंदन.. पण ८२ गुणांच फार ओझही घेऊ नका…
अर्थातच..गुणांकन माझ्या हातात नाही म्हणा. आपण आपले लिहित जावे हेच खरे.
Congratulations Shreyaji… Abhinandan…
धन्यवाद सागर, तुम्ही काय आजकाल काहिच लिहित नाही ! ना कविता, ना ऑर्कुट स्क्रॅप्स. का बुवा ?
अभिनंदन श्रेया,
आणी
Keep it up!
धन्यवाद सीमा.
अभिनंदन हं 🙂
माझी कथा पण अशीच. मी पण २००६ पासून लिहितेय पण आज मी नोंदणी केली इंडीब्लॉगवर…..आहे ना गंमत 🙂
धन्यवाद जयश्रीताई. आज नोंदणी केलीतं म्हणजे आहे महिनाभर वाट पहाणे. पण तुमचा ब्लॉग यात उतरला म्हणजे आमचे गुणांकन खाली गेल्यातंच जमा पुढच्या महिन्यात 🙂